मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये (गिफ्ट सिटी) सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. यानंतर आता राजकारण तापू लागले आहे. मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
“मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून पाहवत नाही. भाजपाच्या मुंबईतल्या नेत्यांची यावर काय भूमिका आहे हे स्पष्ट व्हायला हवे. काँग्रेसच्या राजवटीत झाले नाही त्यापेक्षा जास्त ताकदीने मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे. एखाद्या राज्याचा विकास झाला म्हणून आमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. प्रत्येक राज्याचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे तरच देशाचा विकास होईल. ते करण्यासाठी मुंबईचा अपमान करणे हे कितपत योग्य आहे,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
“मुंबई देशाला २.५ लाख कोटी रुपये देत आहे. तुम्ही तुमच्या पैशांनी इतर राज्यांचा विकास करा. आमच्या पैशावर बाजीरावगिरी करु नका. राष्ट्रहितासाठी आम्ही नेहमीच त्याग केला आहे. त्याविषयी आम्हाला काही म्हणायचे नाही. पण प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर अन्याय का? मुंबई शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी हे सुरु आहे का?”, असेही संजय राऊत म्हणाले.