सातारा (वृत्तसंस्था) फलटण शहरातील पोतेकर कुटुंबातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या पिता-पुत्रांचा काही अंतराने आकस्मित दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्दी झाली म्हणून दोघांनी रात्री जेवणानंतर घरातच बनविलेला आयुर्वेदिक काढा पिला होता. हणमंतराव पोतेकर, अमित पोतेकर अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
फलटण शहरातील नारळीबाग (गजानन चौक) येथे हणमंतराव पोतेकर (वय ५५) हे एक मुलगा, मुलगी आणि पत्नी यांच्यासोबत राहत असून त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अमित हणमंत पोतेकर (वय ३२) हा पुणे येथे बँकेत नोकरीस असून घराच्या बाहेर त्यांचे चहाचे दुकान आहे. अमित हा सुट्टी असल्याने घरी आला होता. त्यामुळे दुपारी मांसाहारी तर सायंकाळी गोड पुरण पोळ्याचे जेवण घरात बनवण्यात आले होते. अमितला थोडीफार सर्दी झाली होती. त्यामुळे जेवणानंतर वडील हणमंतराव यांनी स्वतः बनविलेला आयुर्वेदिक काढा अमितला दिला. तसेच, स्वत:ही ते हा काढा प्यायले. काहीवेळ गप्पा मारल्यानंतर ते झोपी गेले. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले.
यावेळी काढा पीत असताना हणमंतराव यांच्या मुलीला त्रास झाल्याने तिने थोडाच काढा पिला. काढा पिल्यानंतर हणमंतराव आणि अमित यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास दोघांचा पंधरा मिनिटाच्या अंतराने मृत्यू झाला. अन्नातून विषबाधेचा संशय व्यक्त होत असून शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास फलटण येथील स्मशानभूमित शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून येत्या आठ दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. या पितापुत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.