मुंबई (वृत्तसंस्था) दररोज ९५ रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीनंतर जवळपास १४ लाख रुपये मिळू शकतात, अशी भन्नाट योजनेचे नाव आहे, ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना (Gram Sumangal Dak Jeevan Bima Scheme) ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही एक मनी बॅक पॉलिसी (Money Back Policy) आहे.
१० लाख रुपयांपर्यंतचा विमा
१९ ते ४५ वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती सुमंगल ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. या योजनेत दोन मॅच्युरिटी पीरियड्स आहेत. पॉलिसीधारक १५ वर्ष किंवा २० वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकतात.
इतर फायदे
पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत संबंधित ग्राहक हयात असेल, तर त्याला मनी बॅक योजनेचा फायदा होतो. तीन वेळा हा लाभ मिळतो. या अंतर्गत १५ वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि १२ वर्षं पूर्ण झाल्यावर २०-२० टक्के रक्कम परत मिळते. याच तऱ्हेने २० वर्षांच्या पॉलिसीमध्ये ८, १२ आणि १६ वर्षांनी २०-२० टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित ४० टक्के रक्कमदेखील दिली जाते. एखादी व्यक्ती २५ वर्षांची असेल आणि सात लाख रुपयांच्या विमा पॉलिसीमध्ये २० वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा २८५३ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे ९५ रुपयांची बचत करावी लागेल. सहा महिन्यांसाठी १७ हजार १०० रुपये, तर तीन महिन्यांसाठी ८८५० रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मॅच्युरिटीनंतर १४ लाख रुपये मिळतील.
१४ लाखांचा परतावा कसा मिळवाल?
२० वर्षांच्या पॉलिसीमध्ये 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह, विमा रकमेच्या २० टक्के रक्कम आठव्या, बाराव्या आणि १६ व्या वर्षांत कॅशबॅक म्हणून मिळेल. ७ लाखांपैकी २० टक्के रक्कम म्हणजे, १.४ लाख रुपये. ही रक्कम तीन वेळा भरल्यानंतर एकूण ४.२ लाख रुपये होतील. त्यानंतर २० व्या वर्षी तुम्हाला २.८ लाख रुपये मिळतील. यासह, निश्चित कालावधीची रक्कम पूर्ण होईल. यानंतर, तुम्हाला वार्षिक ४८ रुपये प्रति हजार बोनस म्हणून मिळतील. याचप्रमाणे, २० वर्षांत ही रक्कम ६.७२ लाख रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ९.५२ लाख रुपये मिळतील. मनी बॅक आणि मॅच्युरिटी मिळून मिळून १३.७२ लाख रुपये इतकी रक्कम होईल.