मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या खळबळ माजली आहे. वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली असून याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाल्याची माहिती दिली आहे
समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आलं होतं त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात. ते २०१५ पासून तिथे जातात. या दरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी (११ ऑक्टोबर) जाणवलं. विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले आहे. त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती ही मुंबई पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती आहे, असं वानखेडे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवाब मलिकांच्या आरोपांनंतर समीर वानखेडेंवर पाळत?
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी स्वत: समीर वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.