नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलक कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आपला निषेध व्यक्त करत आहेत. याच दरम्यान आणखी एका आंदोलकानं ‘सुसाईड नोट’ लिहीत आपला जीवनप्रवास संपवल्याचं समोर येतंय. टिकरी सीमेवर विषारी पदार्थाचं सेवन करत या शेतकऱ्यानं प्राण सोडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांच्या प्रदर्शन स्थळांपैंकी एक असलेल्या टिकरी सीमेवर विषारी पदार्थाचं सेवन करत या शेतकऱ्यानं प्राण सोडले. विषारी पदार्थ घेतल्याचं लक्षात येताच आंदोलकांकडून या शेतकऱ्याला बुधवारी अॅम्ब्युलन्सनं संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ४२ वर्षीय जय भगवान राणा यांचा विषारी पदार्थाचं सेवन केल्यानंतर मृत्यू झाला आहे. हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील पकासमा गावाचे ते रहिवासी होते. राणा यांनी मंगळवारी टिकरी सीमेवर प्रदर्शनस्थळावरच विषारी पदार्थाचं सेवन केलं होतं. ‘आपण एक छोटे शेतकरी आहोत. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात अनेक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा केवळ दोन – तीन राज्यांचा मुद्दा आहे. परंतु, संपूर्ण देशातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. दु:खद म्हणजे आता हे केवळ आंदोलन राहिलेलं नाही तर ही मुद्द्यांची लढाई बनलीय’ असं जय भगवान राणा यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, आंदोलनकाळात जवळपास पाच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या आंदोलनस्थळी आत्महत्या केली आहे. ९ जानेवारी रोजी सिंघु सीमेवर ३९ वर्षीय अमरिंदर सिंह या शेतकऱ्यानं विषारी पदार्थ घेत आत्महत्या केली होती. त्यापूर्वी २ जानेवारी रोजी गाझीपूरमध्ये उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर ७५ वर्षीय सरदार कश्मीर सिंह या शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली होती. हा शेतकरी उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचा रहिवासी होता. २८ डिसेंबर २०२० रोजी दिल्लीच्या टिकरी सीमेवर आंदोलन स्थळापासून काही अंतरावर पंजाबच्या एका आंदोलनकर्त्या वकिलांनी विष घेऊन आत्महत्या केली होती. अमरजीत सिंह हे पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबादचे रहिवासी होते. यापूर्वी १६ डिसेंबर २०२० रोजी कर्नाल जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय शीख संत बाबा राम सिंह यांनी कुंडली सीमेवर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाने सरकारच्या राजकीय अडचणींमध्येही वाढ केली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठकींचं सत्र सुरु आहे, परंतु, शेतकरी आंदोलनावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही.