भुसावळ/अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात दोन खून झाल्याचे समोर आले आहे. भुसावळसह अमळनेरमध्ये वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा खून झाला आहे. नाजीर शेख नशीर (वय ३१, रा. भुसावळ) आणि प्रवीण पांडुरंग पाटील (रा. दहिवद पोस्ट टाकारखेडा ता. अमळनेर) अशी मयतांची तरुणाचे नाव आहेत.
भुसावळात तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला !
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात काळीज चिरणारा आक्रोश केला होता. दरम्यान, बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे कळते. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे कळते.
अमळनेरात न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा !
दुसऱ्या घटनेत न्यायालयाच्या आदेशाने 22 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण पांडुरंग पाटील (वय ३२, रा. दहिवद खुर्द), असे मयत तरुणाचे नाव आहे. लोणे-भोणे फाट्याजवळ 22 एप्रिल रोजी प्रवीण पाटील हा नाल्याच्या काठी मयत अवस्थेत आढळून आला होता. अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील या संशयित इसमाविरुद्ध हा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील भांडणाच्या वादातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयीन आदेशाने दाखल खूनाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विकास शिरोळे हे करत आहेत.