जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील शानबाग विद्यालयाने फी अभावी काही विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला होता. याविरुद्ध एका पालकाने तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सर्वांचे जाबजबाब घेतल्यानंतर चौकशीअंती शालेय प्रशासन हे दोषी असल्याचे दिसून येत आहे, असा अहवाल जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिक्षण अधिकारी आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणात सरले असून या शैक्षणिक सत्राचा निकाला जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नसतानाही जळगावातील शानबाग विद्यालयाने ऑफलाईन निकाल जाहीर करुन काही विद्यार्थ्यांना निकालपत्रही वाटप केले होते. तर ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे. त्यांचे निकाल देखील रोखण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यार्थ्याचे पालक रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरुन तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर शानबाग विद्यालयाने आपला खुलासा सादर केला होता. तर खुलाशाविरुद्ध मुख्य तक्रारदार रवींद्र शिंदे यांनीही आपले म्हणणे लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकार्यांकडे सादर केले आहे. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी याप्रकरणी शाळेतील विविध लोकांचे जाब जबाब नोंदवून घेतल्यानंतर चौकशीअंती शालेय प्रशासन हे दोषी असल्याचे दिसून येत आहे, असा अहवाल दिला आहे.
काय म्हटले आहे चौकशी अहवालात
रवींद्र शिंदे ( प्लॉ नं.५५, विधीजीत रेसीडेन्सी, यमुना नगर आयोध्या नगर एम.आय.डी.सी., जळगाव) यांचा पाल्य प्रसाद रविंद्र शिंदे हा के श्रीमती व.गो. शानभाग विदयालय (सावखेडा बु. शिवार ता. जळगाव) या शाळेत शिकत असून त्याचा निकाल शाळेने फी वाकी असल्याने राखून ठेवला आहे व संबधीत शाळेस या संबंधी लेखी उत्तर दया किंवा निकाल दया?, अशी मागणी केल्यावर दि. ०५/०५/२०२१ रोजी वर्ग शिक्षकाने व्हॉट्स ॲप वर दुपारी ३ वाजता निकाल दिला अशी तक्रार भ्रमणध्वनीवरुन दि.०५/०५/२०२१ रोजी श्री. शिंदे यांनी केली होती. तसेच संदर्भ क्र. २ नुसार तक्रारदार शिंदे यांनी याच बाबतीत दि. ०७/०५/२०२१ रोजी Whatsapp द्वारे लेखी तक्रार या कार्यालयास सादर केले आहे. या दोन्ही तक्रारींची त्वरीत दखल घेवून दि. ०७/०५/२०२१ रोजी कै. श्रीमती ब.गो. शानभाग विदयालय, सावखेडा बु. शिवार, ता. जळगांव या शाळेच्या मुख्याध्यापकास लेखी कारणे दाखवा नोटीस तात्काळ बजावण्यात आली होती.
या कारणे दाखवा नोटीसीनुसार शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली पांडूरंग महाजन यांनी दि.१०/०५/२०२१ रोजी लेखी खुलासा सादर केला. आपल्या खुलाश्यात त्यांनी श्री. रविंद्र हिम्मतराव शिंदे यांचा पाल्य चि. प्रसाद रविंद्र शिंदे याचा निकाल संबंधीत पालकांना व्हॉट्स ॲप वर त्वरीत देण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही. परंतु फी संकलन करणे किंवा मागणी करणे ही आमची प्रशासकिय जबाबदारी आहे. परंतु कोणावरही आम्ही सक्ती केलेली नाही. संस्था नेहमीच सामाजिक जाणीवेतून कार्य करीत आलेली आहे. विना अनुदानित विभागाचे कामकाज कसे चालवावे हे एक मोठे आव्हान आहे. या विषयी आपण जाणता असा लेखी खुलासा या कार्यालयास सादर केला. हा प्राप्त झालेला लेखी खुलासा तक्रारदार रविंद्र शिंदे यांना त्यांच्या मागणीनुसार व्हॉट्स ॲप द्वारे पाठविण्यात आला.
शाळेकडून प्राप्त झालेल्या खुलाशाबाबत रविंद्र शिंदे यांनी दि. ११/०५/२०२१ रोजी सविस्तर लेखी निवेदन या कार्यालयास सादर केले. या प्राप्त निवेदनानुसार संबंधीत वर्गाचे वर्ग शिक्षक व शाळेचे उपमुख्याध्यापक यांना दि.१८/०५/२०२१ रोजी या कार्यालयात समक्ष बोलावून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली व त्यांचे लेखी जबाब घेण्यात आले. वर्ग शिक्षक हर्षल सुधाकर भोलाणे यांनी आपल्या लेखी जबाबात, सदर विदयार्थ्याची वर्षभराची फी बाकी आहे म्हणून मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच वरिष्ठांची सुचना मिळाल्यावर त्याच दिवशी तातडीने सदर विदयार्थ्यास निकाल वितरीत केला गेला, असा लेखी खुलासा सादर केला. तसेच जयंत प्र. टेंभरे, उपमुख्याध्यापक यांनी, ‘सदर विद्यार्थ्याची वर्षभराची फी बाकी आहे. आपणास ती भरण्यास काही अडचण आहे का ? आपण आर्थिक संकटात आहात का?, अशी विचारणा केली व निकाल त्वरीत मिळेल असे सांगीतले. व त्यांना लगेच निकाल वितरीत केला. असा लेखी जबाव सादर केलेला आहे.
रविंद्र शिंदे यांनी सादर केलेल्या तक्रारी व त्यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापीका उपमुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांनी सादर केलेले लेखी जबाब आणि त्यांची केलेली चौकशी यावरुन असे दिसून येते की, संबंधीत शाळेने तक्रारदार यांच्या पाल्याची वर्षभराची फी बाकी असल्यामुळे सकाळी ९ वाजता निकाल दिलेला नाही. सबंधित तक्रारदार यांनी भ्रमणध्वनीवरुन शाळेचे वर्गशिक्षक व उपमुख्याध्यापक यांना निकालाची मागणी केली. अन्यथा निकाल न देण्याबाबत लेखी उत्तर दयावे, अशी मागणी केली. त्यानंतर उशिराने दुपारी ३:०० वाजता संबंधीत शाळेने तक्रारदार यांना व्हॉट्स ॲपद्वारे निकाल दिलेला आहे. तरी सदर चौकशीअंती शालेय प्रशासन हे दोषी असल्याचे दिसून येत असून भविष्यात अशी चूक पुन्हा घडून येवू नये या दृष्टीने मजकूर शाळेस आपल्यास्तरावरुन सक्त ताकिद देण्यात यावी असे मत आहे. तथापि, पुढील कार्यवाहीस्तव व आदेशार्थ सदर चौकशी अहवाल सादर करीत आहे, असे गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत आता शिक्षण अधिकारी शानबाग शाळेविरुद्ध काय कारवाई करतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सदर प्रकरणी गटशिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या अहवालामुळे संबंधित शाळा व शाळेचे व्यवस्थापन मंडळ हे सामाजिक कार्य करण्याचा आव आणणारे आता तोंडघशी पडल्याचे दिसत आहे.
रवींद्र शिंदे (मुख्य तक्रारदार)