पंढरपूर (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत या ना त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. पण आता मुद्याची लढाई पार गुद्यावर आली आहे. पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला तोंडाला काळे करून चांगलाच चोप दिला. पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाच्या तोंडाला काळे फासून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कृत्यावरून भाजपचे आमदार राम कदम शिवसेनेवर चांगलेच संतापले आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहराचे माजी भाजप अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमधील नाराज शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना भर रस्त्यात तोंडाला काळे फासून विठ्ठल मंदिर परिसरात धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला.
शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे विज बिल विरोधात आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ शब्दांचा वापर केला. त्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली. याचा जाब विचारण्यासाठी पंढरपूर शिवसेना माजी अध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यांची नामदेव पायरी ते पश्चिमद्वार अशी धिंड काढण्यात आली. कटेकर यांच्या हातात बांगड्या, हार, बुक्का लावून या वक्तव्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडून करण्यात आला.
याबाबत राम कदम म्हणाले की, ‘पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग. सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते’, अशा शब्दांत राम कदम यांनी संताप व्यक्त केला. याशिवाय, ‘हे सगळं ठरवून ? निद्रिस्त अवस्थेत असलेला महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.