मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस माफीचे पत्र लिहिले होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर केल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.
नेमके काय म्हणाले त्रिवेदी?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य करताच भाजपने त्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते. मात्र, सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, सावरकरांच्या काळात अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबास असे पाच पत्र लिहिले होते. मग त्याचा अर्थ काय होतो?. पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.
सुधांशु त्रिवेदी यांचे हे वक्तव्य समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य ठार वेडाच करू शकतो, अशा शब्दांत आव्हाडांनी त्रिवेदींना सुनावले. तर रोहित पवार यांनीही ट्विट करत सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केला.