अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्ह्यातील (Amravati district) अचलपूर तालुक्यातील परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येनि पांढरी शेत शिवारात विवाहित प्रेमीयुगुलाने चायना चाकूच्या साहाय्याने पोटात वार व गळा चिरत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अलका मनोज दोडके (वय ४८ रा. रामनगर कांडली) आणि सुधीर रामदास बोबडे (वय ५२ राहणार वनश्री कालनी कांडली) अशी चाकूने वार करत आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याची नावे आहेत. दोघेही विवाहित असून यांना मूले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांपासून हे दाम्पत्य बेपत्ता होते. दरम्यान, काल पांढरी परिसरातील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचाही एकमेकांना अलिंगण घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. दोघांच्याही हातात चायना चाकू असल्याचे आढळून आले. या दाम्पत्याने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणामुळे केली याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये. या दोघांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
४८ वर्षीय महिला अलका दोडके ही घरी न आल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत होता त्यांनी मोबाइलवर सुद्धा प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी शोधाशोध केली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. पांढरी शेत शिवारातील रक्ताच्या थारोळ्यात हा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले म्हणाले की, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस पंचनामा करत असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. पंचनामा व इतर माहिती घेतल्या जाईल गळ्यावर पोटात चाकूचे वार केल्याची प्रथमदृष्ट्या दिसत आहे. या प्रकरणातील दोघेही प्रेमीयुगल हे विवाहित आहेत. सुधीर हा पान टपरी चालवतो तर अलका ही टेलरिंगचे काम करत होती. सुधीरने आधी अलका हिची हत्या केली असावी आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.