नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाली आहे. इथल्याच एका विद्यार्थ्यांनं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावरील आपबिती सांगितल्यानंतर इथली भीषण परिस्थिती समोर आली आहे.
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांमधील एका विद्यार्थ्यानं व्हिडिओच्या माध्यमातून गुजराती भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यानं सांगितलं की, “आम्हाला युक्रेनच्या लोकांकडून त्यांच्या देशाची सीमा ओलांड्यापासून रोखण्यात आलं. भारत कथीतरित्या रशियाच्या बाजूनं असल्यानं आमच्यावर हा हल्ला झाला आहे” या विद्यार्थ्यानं म्हटलं की, चाळीस किमीची पायपीट करुन रात्री आम्ही उणे १५ डिग्री सेल्सिअस तापमानात आम्ही युक्रेन-पोलंड सीमेवर पोहोचलो. या ठिकाणी येईपर्यंत आमच्या पायातील बूट-चप्पला देखील नव्हत्या. त्यामुळं सीमेवर थांबण्यासाठी आमची चांगली व्यवस्थाही नव्हती. आम्हाला सीमापार पोलंडमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. यावेळी बंदुकधारी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली.
अस्थमाचा त्रास असणाऱ्यांचाही छळ
दरम्यान, साक्षी नामक एका मुलीनं सांगितलं की, “आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा सुरक्षा रक्षकांनी आम्हाला घेरलं होतं. आम्हाला एन्ट्री पॉईंटवर जाण्यापासून रोखण्यात आलं. युक्रेनचे नागरिक खूपच भेदभावपूर्ण वागत होते. याठिकाणाहून केवळ युक्रेनच्या लोकांनाच सीमापार जाऊ दिलं जात होतं. आम्ही बराच काळ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी आधी फक्त भारतीय मुलींना जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर तिथं बंदुकाधारी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी भारतीय मुलांना खूप मारलं. त्यानंतर त्यांनी या मुलांचा इतका छळ केला की एका मुलाला अस्थमाचा त्रास होता त्याला मारहाणीदरम्यान श्वास घ्यायला कसा त्रास होतोय हे ते सांगत होते. त्यानंतर रात्री ११ ते १२ वाजता या मुलांना प्रवेश देण्यात आला. या सर्व प्रकारामुळं आम्ही खूपच जास्त घाबरलो होतो. यानंतर इथं जे सुरक्षा रक्षक होते त्यांना तीन रांगा हव्या होत्या पण आम्ही चार रांगा बनवल्यानं त्यांनी बंदुकांसह आम्हाला मारहाण केली. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तिथं व्हिसासंबंधी ‘हंटर गेम’ असं काहीसं सुरु होतं तिथं ते रॉड आणि बंदुका घेऊन उभे होते. तुम्हाला व्हिसा हवा असेल तर हा खेळ खेळावा लागेल अस त्यांच्याकडून सांगण्यात आलं. यावेळी देखील त्यांनी मुलगा-मुलगी काहीही न पाहता लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली”
युक्रेन-हंगेरी सीमेवर विद्यार्थी हतबल
युक्रेन-हंगेरी सीमेवर देखील काही भारतीय विद्यार्थी पोहोचले असून ते अक्षरशः हतबल झाले आहेत. रडून एका विद्यार्थ्यानं आपल्यावरील अडचणीचा पाढा वाचला. त्यानं म्हटलं की, “युक्रेन-हंगेरी सीमेवर गेल्या दहा तासांपासून आम्ही अडकून पडलो आहेत. पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला इथं विचारायला आलं नाही. स्वतःला आम्ही अजून किती काळ सांभाळायचं आमच्या ज्युनिअर विद्यार्थ्यांना किती काळ सांभाळायचं? असा सवालही या विद्यार्थ्यानं केला आहे. आम्ही आता खूपच वैतागलो आहोत यापेक्षा आम्ही मेलो असतो, एखादं क्षेपणास्त्र आमच्यावर येऊन पडलं असतं तर बरं झालं असतं. इथं आमचे आई-बाप नाहीत, कोणीही नाही. केवळ असं सांगितलं जातंय की, तुमच्यासाठी इथं अधिकारी उभे आहेत. पण इथं कोणीही आमच्यासाठी नाही”