कोल्हापुर (वृत्तसंस्था) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे काळ्या जादूचे प्रकार दिसून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही ठिकाणी साधूंना बोलावून वेगवेगळ्या पूजाअर्चा केला जात असल्याचं उघडकीस आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातल्या मुदत संपलेल्या 7751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान असेल. ग्रामपंचायतींसाठी 20 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या एक दिवसआधी बामणी गावांमध्ये एका उमेदवाराकडे चार परप्रांतीय साधू आल्याने चर्चांणा उधाण आले आहे. हा प्रकार समजताच गावातील तरुणांनी या साधूंचा पाठलाग करत त्यांना गावातून पिटाळून लावलं. सुरुवातीला गावातील उमेदवाराचा पत्ता विचारणारे साधू नंतर मात्र आपण रामेश्वरच्या यात्रेसाठी जात असल्याचे कारण सांगितले. पण तरुणांनी रामेश्वर यात्रा गावात नसताना गावात काय काम असा जाब विचारात या साधूंवर प्रश्नाचा भडीमार केला. हे साधू कसे बसे ग्रामस्थांच्या तावडीतून सुटले. पण हे साधू नेमकं कोणत्या उमेदवाराकडे आले होते, तो उमेदवार साधूंना बोलावून काय करणार होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.
















