जळगाव (प्रतिनिधी) १८ डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिनाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावी आले असता त्यांना मुस्लिम समाजातर्फे विविध १३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले व या मागण्यांची पूर्तता सरकारने त्वरित करावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे साकडे घालण्यात आले.
अल्पसंख्याक समाजाबद्दल शासनाची उदासीनता
अल्पसंख्यांक मंत्रालय, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मौलाना आझाद महामंडळ, पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रम, जिल्हा अल्पसंख्यांक विकास नियंत्रण समितीमार्फत अल्पसंख्यांकांची विविध कार्य जोपासण्यासाठी या संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु या संस्थांमार्फत आवश्यक ती कारवाई केली जात नसल्याची खंत फारुक शेख यांनी उप मुख्यमंत्री पवार यांचे कड़े व्यक्त करून ही उदासीनता या शासनाने त्वरित दूर करावी त्यासाठी खालील मागण्या करण्यात आल्या.
निवेदनातील मागण्या
सच्चर समितीच्या अहवालावर त्वरित करवाई करावी, अल्पसंख्यांकांना शैक्षणिक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अल्पसंख्यांक समाजाच्या योजनांसाठी बजेटमध्ये वाढ करण्यात यावी व जे बजेट खर्ची केले जात नाही ते पूर्णपणे खर्च करणे आवश्यक आहे, महाराष्ट्रात उर्दू भाषेला दुय्यम स्थान मिळाले पाहिजे, शासनाने अल्पसंख्यांक आयोगाची व उर्दू अकॅडमीची स्थापना त्वरित करावी, महाराष्ट्र राज्यातील ३६ पैकी फक्त पाच जिल्ह्यात उर्दू घर स्थापन झाले आहे ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्वरित करावे, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक समितीची स्थापना करावी, अल्पसंख्यांक समाजातिल लोकांची संख्या करागृहात मोठ्या प्रमाणात असून ती कमी करण्यासाठी संशोधन करून आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावे, अल्पसंख्यांक समाजाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अल्पसंख्यांक समाजा संबंधित नवीन विविध योजनांची आखणी करण्यात यावी व अल्पसंख्यांक समाजाला जे नेहमी संशयाच्या नजरेने बघितले जाते त्यासाठी योग्य ती उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या
मनियार बिरादरीचे फारूक शेख व सैय्यद चाँद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष मजहर पठाण, सलीम इनामदार राज्याचे सचिव एजाज मलिक, फारूक अहेलेकार, काकर बिरादरीचे रियाज़ काकर, सिकलगर बिरदारीचे अनवर खान व मुजाहिद खान, माजी हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर डॉक्टर एम इक़बाल शेख, युवा मनियार बिरादरीचे मोहसीन शेख, ईद गाह शॉपिंग कॉम्प्लेक्स चे शेख सलीम, वहायरल न्यूज चॅनेल हाफिज अब्दुल रहीम, हामिद शेख, कासिम उमर, मोहम्मद नईम, महबूब शेख व अकील मनियार आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहविभागाचे चिटणीस विलास हरणे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या मार्फत १३ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले.