नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील तणाव गेल्या सहा महिन्यांपासून वाढत आहे. दोन्ही बाजूंनी विशिष्ट कालावधीत सर्व संघर्ष स्थळांवरून सैन्य आणि शस्त्रे काढून घेण्याच्या तीन-चरण प्रक्रियेवर सामान्य करार झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
या प्रस्तावातील ठळक बाबींमध्ये, करार झाल्यापासून एक दिवसाच्या आत सैनिकांची वाहतूक करणारी वाहने हटवणे, पँगाँग तळ्याच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवरील ठरावीक भागांतून फौजा माघारी घेणे, तसेच दोन्ही बाजूंच्या सैन्यमाघारीची पडताळणी करणे यांचा समावेश आहे. सैन्याची माघार आणि एप्रिलमध्ये होती तशी परिस्थिती पुन्हा बहाल करणे याबाबतच्या प्रस्तावाला ६ नोव्हेंबरला भारतीय व चिनी सैन्यात चुशुल येथे झालेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या आठव्या फेरीत अंतिम रूप देण्यात आले. दोन्ही बाजूंनी जे प्रस्ताव मान्य केले आहेत, त्याबाबत कॉर्प्स कमांडर्सच्या पुढील चर्चेत करारावर स्वाक्षरी करण्याची भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांची तयारी असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

















