पुणे (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘हा पुरस्कार माझ्या लेकरांना दोन घास पुरवण्यासाठी आहे, मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा’, अशा शब्दांत सिंधुताई यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. पद्मश्री पुरस्कारामध्ये फासेपारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे. ‘आजपर्यंत फाटलेले आयुष्य मी शिवत शिवत आले, टाके घातले तुम्ही सर्वांना दोरा दिला. अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. लाखो लेकरांना पदरात घ्यायचे आहे, तरच मला सुख मिळणार आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही सर्व जण गणगोत व्हा, मायी तुमची आभारी आहे, असं म्हणत सिंधुताईंनी केंद्र सरकारचे आभार मानले.
“एकेकाळी रेल्वेत भीक मागून आणि स्मशानात झोपून मी दिवस काढले. पण तशी वेळ इतर महिलांवर येऊ नये यासाठी मी निर्धार केला आणि अनाथांची माय झाले”, अशा शब्दात त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. “मी माझं जीवन जगत गेले. चालत राहिले. फक्त त्यावेळी मी मागे वळून पाहिलं एवढंच… एकेकाळी नातलगांनी आणि मित्रपरिवाराने खांदा काढून घेतला होता. पण आज अख्खं जग मला खांद्याने आधार देत आहे”, असं त्या म्हणाल्या. “मला आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला याचाच अर्थ माझे खांदे अधिक मजबूत व्हावेत याचीच सरकारने काळजी घेतली आहे. हा पुरस्कार मला मिळेल याची मला कधी अपेक्षा किंवा कल्पनाच नव्हती”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
“मी अशी आहे तरी कोण? मी आपली हाफ टाईम मराठी चौथी पास…. नऊवारी जिंदाबाद… घेणं देणं नाही अशी अडाणी बाई… पद्मश्रीपर्यंत कशी जाऊ शकेल? माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे एका अर्थी धक्काच आहे”, इतक्या साध्या सरळ आणि सोप्या शब्दात त्यांनी पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली. तसेच, जीवन प्रवासात समाजातील ज्या साऱ्यांनी सढळहस्ते मदत केली, त्यांना त्यांनी पुरस्कार अर्पण केला.
केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालासुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. तर तरुण गोगोई आणि रामविलास पासवान, केशुभाई पटेल या राजकीय नेत्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण, तर दिवंगत गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
















