जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील लेलेनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पहूर कसबे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना ग्रामस्थांनी दिला आहे. पावसाळ्यातच पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.
पहूर कसबे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहूर कसबे गाव हे जामनेर विधानसभा मतदारसंघात आहेत. आणि याच पहुर कसबे गावातील लेलेनगर परिसरातील काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या नळाला १० दिवस उलटुनही पाणी येत नाही. तर काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या नळाला ११ दिवस उलटुनही पाणी येत नाही. त्यामुळे पावसाळ्यातच सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लेलेनगर परिसरातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अन्यथा पहूर कसबे ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे, माजी उपसरपंच शे. युसुफ गयासोद्दीन, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते सरफोद्दीन शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहे.