नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी भाषण संपवून संसदेबाहेर जाताना त्यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केला, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. खासदारकी बहाल झाल्यानंतर आज राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत सहभागी झाले. मात्र आजच्याच दिवशी राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला आहे. लोकसभा सचिवालयाची सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेत असभ्य वर्तनाबाबत सर्वांशी बोलून नियमानुसार कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.
अविश्वास प्रस्तावाच्या पहिल्या दिवशी भाषण न केलेल्या राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशी जोरदार भाषण ठोकून भाजपला धारेवर धरलं. भारतमाता ही माझी आई आहे.
मणिपूर हा भारताचं अविभाज्य अंग आहे. या सरकारने मणिपूरचे दोन तुकडे केलेत. म्हणजे या सरकारने माझ्या आईचीच हत्या केलीये, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. नरेंद्र मोदी केवळ अमित शाह आणि गौतम अदानी या दोन माणसांचंच ऐकतात, बाकीच्यांचा आवाज त्यांना ऐकू येत नाही. मणिपूर जळत असताना मोदी आणखी तिकडे का गेले नाहीत? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. सुमारे अर्ध्या तासाचं आक्रमक भाषण संपवून राहुल गांधी संसदेतून निघाले.
स्मृती इराणी यांनी बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाषण संपवून संसदेबाहेर जाताना राहुल गांधी यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केला असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला आहे. भाषण संपल्यानंतर त्यांनी असभ्य वर्तन केले. त्यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत असा आरोपही स्मृती इराणी यांनी केला आहे. यातून राहुल गांधींच्या कुटुंबाचे संस्कार दिसले अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली. दरम्यान, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र दिले आहे.