मुंबई (वृत्तसंस्था) आम्हाला सात खाती दिली, १० खाती दिली याचं फार कौतुक नाही. तो आमचा अधिकार होता. तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून १०-१२ खाती घ्या म्हणून सांगितलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रतिउत्तर देत असतांना खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथराव खडसे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, भाजपने एकनाथ खडसे यांना अनेक महत्त्वाची खाते दिली होती. मात्र, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना काय दिलं? त्यामुळे भाजपने मला काहीच दिलं नाही, अशी एकनाथ खडसे यांनी भाजपची बदनामी करू नये, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथराव खडसे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर देत अनेक बाबींवर भाष्य केलं. ४० वर्ष अहोरात्र भाजपचं काम आम्ही केलं. मेहनतीचं फळ म्हणून मला मंत्रिमंडळात चांगलं स्थान दिलं. भाजपनं मला काहीच दिलं नाही असं मी कधीच म्हटलं नाही. ज्यांचं भाजपमध्ये काहीच योगदान नाही त्यांनाही आता चार-पाच खाती मिळतायत. आम्हाला सात खाती दिली, १० खाती दिली याचं फार कौतुक नाही. तो आमचा अधिकार होता. तुम्हाला मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून १०-१२ खाती घ्या म्हणून सांगितलं.
स्पर्धकच कमी झाला पाहिजे म्हणून काय पाहिजे ते घ्या आणि मंत्रिमंडळात या असा विषय होता. मी भाजपची बदनामी केली नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही विषयावर मी काहीही बोललेलो नाही. चाळीस वर्षे हमाली करून ऐनवेळी माझं तिकीट कापून मला विजनवासात पाठवण्याचा डाव होता. त्यावेळी मला राष्ट्रवादीने एमएलसी देऊन आमदार केलं. म्हणून मी राजकारणात जिवंत असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे.