जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोलाणे येथे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने विष प्राशन केले होते. यामागे ऑनलाईन अभ्यासाच्या तणाव हे प्रमुख कारण समोर आले आहे.
अश्विता विजय कोळी (सपकाळे, वय २०) तर मोठा भाऊ विश्वजीत (वय २२) हे दोघे उल्हासनगर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होते. अश्विता प्रथम वर्ष विज्ञान शाखा तर विश्वजीत शेवटच्या वर्षाला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महाविद्यालय बंद झाले. यानंतर दोघे जण मुळ गावी भोलाणे येथे आले. महाविद्यालयाचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्यांना अभ्यासात मन लागत नव्हते. अनेक विषयांचे ज्ञान व्यवस्थित मिळत नव्हते. त्यामुळे दोघेजण नैराश्यात आले होते. दरम्यान, १६ रोजी भाऊबीजेच्या दिवशी रात्री १० वाजता दोघांनी राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने ते अत्यवस्थ झाले. हा प्रकार लक्षात येताच वडीलांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच अश्विताचा मृत्यू झाला. यानंतर विश्वजीत याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. पोलिसांनी विश्वजीत याचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार अभ्यासाच्या तणावातून नैराश्य आल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला, असा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे. दरम्यान, अश्विताच्या मृत्यू प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास साहेबराव पाटील हे करीत आहेत.