कोलकाता (वृत्तसंस्था) भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. गांगुली यांच्या छातीत पुन्हा एकदा दुखू लागलं आहे. यामुळे त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता. मात्र आज पुन्हा त्याला त्रास जाणवू लागला आहे.
काल रात्रीपासून सौरव गांगुलीच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर आज सकाळी त्याने डॉक्टरांशी बातचित केली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. नुकतीच माहिती मिळाली आहे की, गांगुलीच्या कुटुंबीयांनी नुकतेच त्याला रुग्णालयात नेले आहे. ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण ४ डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.
“गांगुलीला हृदयाच्या त्रासामुळे वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर त्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झालं. डॉ. सरोज मोंडल यांच्यासह तीन डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे”, अशी माहिती ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी दिली होती.
भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला साऱ्यांच्या आजही लक्षात आहे. BCCI अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. कोरोना संकटातही IPL२०२०चे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा होता.