मुंबई (वृत्तसंस्था) विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही.
वर्ष २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेना मंत्री संजय राठोड, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या. पण सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. कोरोनामुळे यापूर्वीचे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत गुंडाळण्यात आले होते. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण काळ चालेल अशी शक्यता होती. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला आणि पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. त्यामुळेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं याची चिंता सरकार समोर होती.
कोरोनामुळे अधिवेशनात विशेष काळजीही घेतली जाणार आहे. आमदारांची सोशल डिस्टंसिंग राखत सभागृहात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच काही आमदारांची बसण्याची व्यवस्था प्रेक्षक आणि अधिकार गॅलरीत करण्यात येणार आहे. अधिवेशनापूर्वी मंत्री, आमदार, तसंच अधिवेशनासाठी येणार्या कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी अभ्यागत आणि आमदारांच्या पीएना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. अशी सर्व काळजी घेऊन राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पाडणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात नाही
दरम्यान नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचं कामकाज चालवलं जाणार आहे. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचं कळतं.
कमी कालावधीसाठी अधिवेशन होत असल्याने विरोधक नाराज झाले आहेत. विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला आहे. या सरकारला चर्चेपासून पळ काढायचा असल्याने अधिवेशन कमी कालावधीसाठी ठेवण्यात आल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्री गर्दी करतात तिथे कोरोनाचे भय नाही, इथे कोरोनाचे कारण देता.