मुंबई (वृत्तसंस्था) पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी देशभर लढणाऱ्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पत्रकार बांधवांच्या मागण्यांचे निवेदन त्यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर दिले. तसेच ३ ऑक्टोबर २०२१ रोजी संघटनेचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन सातारा येथे होणार असून या कार्यक्रमाचे आमंत्रण देखील त्यांना यावेळी दिले.
मागण्यांचा विचार करून पत्रकार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड), महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदें (ठाणे), विधी व न्याय महाराष्ट्र सल्लागार प्रमुख ऍड मंगेश तिरोडकर (ठाणे), वाई तालुका अध्यक्ष शशिकांत शिंदे या शिष्टमंडळाला दिले. यावेळी पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांना बातमी संकलनासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी (बस) आणि रेल्वेत मोफत प्रवास सुविधा मिळावी, जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले आणि समाजहितासाठी लेखणीचे कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना हक्काचे घरकुल, आजारात मोफत वैद्यकीय सेवा- सुविधा आणि पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण व शालेय शिष्यवृत्ती मिळावी, आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या पत्रकार संघटनेला दैनंदिन कामकाजासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी २ गुंठे शासकीय जमीन कार्यालयासाठी विनामूल्य/नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून द्यावी, वृत्त संकलन करतांना पत्रकारांचा दुर्दैवाने अपघातात किंवा अन्य कारणाने मृत्यू झाल्यास पीडित पत्रकारांच्या परिवारास २० लाखांचा जीवनविमा राज्य सरकारने मंजूर करावा. तसेच दुर्घटना झाल्यास वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदत मिळावी, शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात यावा, पत्रकारांना मासिक मानधन आणि वयोवृद्ध पत्रकारांना निवृत्ती वेतन द्यावे, वृत संकलन करत असताना अथवा सत्य समाजासमोर आणत असताना पत्रकारांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा तसेच धमक्या, मारहाण, जीवाला धोका यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी पत्रकारांना पोलीस सरंक्षण तसेच समाज कंटकांवर उचित कायदेशीर कारवाई इ. मदत तत्काळ करण्यात यावी. जीवघेण्या कोरोना महामारी आपत्तीत जीवाची आणि परिवाराची पर्वा न करता शासनाच्या खांद्याला- खांदा लावून वृत्त संकलनाचे कर्तव्य बजावणारे अनेक पत्रकार या आजाराने बाधित झाले होते. तर अनेकांना उपचार घेतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांना मोफत उपचार मिळाले नसल्याने अनेक पत्रकार बांधव या आजाराने मरण पावले. त्यांचे परिवार उघड्यावर पडले आहेत. विविध दैनिक, साप्ताहिक आणि सोशल मीडियातील जे पत्रकार या आजाराने मरण पावले त्यांच्या परिवाराला शासनाने घोषित केलेली रु.५०,००,०००/- (रुपये पन्नास लाखांची) आर्थिक मदत त्यांच्या वारसांना मिळावी, तसेच बाधित पत्रकारांनी उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची रक्कम देखील त्या पत्रकारांना/वारसांना देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, पत्रकारितेच्या माध्यमातून शासन- प्रशासन ,सामाजिक व सर्व क्षेत्राला मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकार बांधवांच्या मागण्यांचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करावा व नमूद केलेल्या पत्रकार बांधव, भगिनींच्या मागण्या मंजूर कराव्या, अशी मागणी आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकार संघटनेच्यावतीने महाराष्ट्र शासनाला करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्यांचा विचार करून पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. निवेदनावर आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा, जि जळगाव), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव, जि जळगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड जि सातारा), महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदें (ठाणे), विधी व न्याय महाराष्ट्र सल्लागार प्रमुख ॲड. मंगेश तिरोडकर (ठाणे), वाई (जि सातारा) तालुका अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सह्या आहेत.