मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेरून महाराष्ट्र सरकारवर आणीबाणी लादल्याचे व हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपचा शिवसेनेनं आज जोरदार समाचार घेतला आहे. ‘अर्णब गोस्वामी यांस एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.
सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे भाजपचे नेते ठाकरे सरकारवर अक्षरश: तुटून पडले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, सरकारविरोधात मोर्चे काढा, उपोषणं करा, आंदोलनं करा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपच्या या भूमिकेवर ‘सामना’च्या अग्रलेखातून आसूड ओढण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही.