धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला आहे. तसेच धरणगाव व तालुक्यातील नागरिकांनी १०० टक्के कडकडीत बंद पाळून सहकार्य करावे व हा बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करावा, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
नुकत्याच उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात भरधाव कार घुसवून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या आशिष मिश्रा नामक नराधम मुलाने निष्पाप, निरपराध शेतकऱ्यांची चिरडून निर्घृण हत्या करून देशाच्या पोशिंद्याच्या प्रती आपली असंवेदनशीलता दाखवली. या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच अंबाला हरियाणा येथील शेतकरी आंदोलनात लखीमपूर खिरीच्या प्रकरणाची पुनरावृत्ती करणाऱ्या कुरुक्षेत्रच्या भाजप खासदार नायब सैनीचा तीव्र निषेध धिक्कार करून झोपेचे सोंग घेतलेल्या व केवळ भांडवलदारांचेच हित जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या केंद्र सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीचे घटक पक्षांनी केली आहे.
तसेच या घटनेचा जाहीर निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने येत्या ११ ऑक्टोबर रोजी राज्यात राज्यव्यापी बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व धरणगाव व तालुक्यातील नागरिकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील तसेच महाराष्ट्र इंदिरा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये १०० टक्के कडकडीत बंद पाळून सहकार्य करावे व हा बंद प्रचंड प्रमाणात यशस्वी करावा, असे आवाहन धरणगाव शिवसेना तालुका प्रमुख, शहर प्रमुख, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस तालुका अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी केले आहे.
















