धरणगाव (प्रतिनिधी) दि. 25 ऑगस्ट – दिव्यांगांनी स्वतःतील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे रहावे त्यासाठी त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची भूमिका महत्त्वाची असून सकारात्मक भुमिकेतून योजना दिव्यांगापर्यंत पोहचाव्यात. दिव्यांग सेवा हीच ईश्वरी सेवा आहे. त्यासाठी तालुक्यातील 150 दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलिचे वाटप करणार असून वर्ड व्हिजनचे कार्य सामाजिक हिताचे असून कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते वर्ड व्हिजन , दिव्यांग संघटना व भवरलालजी जैन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ प्रसंगी बोलत होते.
यांची होती उपस्थिती !
या प्रसंगी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड , तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, न. पा. चे मुख्याधिकारी विकास नवाडे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाले, तालुका तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रवीण पाटील,मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, वर्ड व्हिजन चे समन्वयक रतिलाल वळवी, अंकिता मेश्राम, विजेश पवार, अश्विन अक्का, आरती पाटील, रचना जाधव, वैष्णवी पाटील, जितेंद्र पाटील , उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, दिव्यांग संघटनेचे तालुका प्रमुख संजय पाटील , यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक, विद्यार्थी , पालक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिव्यांग जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. “मला माझ्या नावाने हाक मारा” या शीर्षका खाली दिव्यांगांच्या हक्कासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात वर्ड व्हीजनचे मॅनेजर जितेंद्र गोरे यांनी वर्ड व्हिजन सेवाभावी संस्थेमार्फत केलेल्या व करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती सविस्तरपणे विषद केली. सूत्रसंचालन उपशिक्षक डॉ. विजय बागुल सर यांनी केले तर आभार वर्ड व्हीजनचे समन्वयक रतिलाल वळवी मानले.
वर्ड व्हिजन मार्फत सेवाभावी उपक्रम !
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 2 हजार 30 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, पिण्याच्या पाण्याची बाटली, शैक्षणिक साहित्य, हायजिन किट (स्वच्छतेसाठी साहित्य) चे साहित्य वर्ड व्हिजन ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेमार्फत घेण्यात आले आहे. याप्रसंगी सदर साहित्य प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यापूर्वीही या सेवाभावी वर्ड व्हिजन मार्फत कोविड काळापासून आजपर्यंत तालुक्यातील 30 – 35 गावांमध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले आहेत.