नागपूर (वृत्तसंस्था) वाकी परिसरात सहलीसाठी गेलेल्या एका तरुणीसह तीन तरुणांचा कन्हान नदीपात्रातील वाकी डोहात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दोघांचे मृतदेह शोध पथकाला मिळाल्यानंतर शनिवारी दोन मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले.
जरीपटका, नागपूर व कामठी येथील सहा मित्र-मैत्रिणी दुपारी एक वाजता दोन दुचाकींनी ट्रिपल सीट वाकीला सहलीसाठी निघाले. नदीपात्रातील पाणी बघून अर्पितला पोहण्याचा मोह झाला. तो नदीपात्रात उतरला. त्यापाठोपाठ विजय, सोनिया व अंशुल पाण्यात उतरले. अर्पित खोल पाण्यात गेल्याने त्याला मृत्यूने गाठले. त्याला शोधण्यास विजय, सोनिया व अंशुल धावले. त्यांनाही काळाने गाठले. या चौघांचे मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासनासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक ढिवर बांधव व गावकरी कामाला लागले होते.
शुक्रवारी दुपारी दीड वाजता सोनिया मरसकोल्हे (१७, नारा नागपूर) हिचा, तर सायंकाळी चार वाजता विजय ठाकरे (१८, नारा नागपूर) यांचे मृतदेह आढळले. उर्वरित दोन मृतदेहांचा शोध बाकी होता. शनिवारी हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना फोनवरून तामसवाडी इटगाव शिवारात मृतदेह तरंगताना दिसत असल्याची माहिती मिळाली. खापा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह अर्पित पाटील (१७ कामठी नागपूर) याचा असल्याचे निष्पन झाले. तो मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंशुल बघेल (१७, कामठी, नागपूर) याचा मृतदेह इसापूर शिवाराजवळून शोधण्यात यश आले.
यानंतर सायंकाळी पाच वाजता ही शोधमोहीम थांबवण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक ढिवर बांधव, खापा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. मुलांचे मृतदेह बघताच नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.