मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. आता यावर सुनिल पाटील यांनी राष्ट्रवादीशी संबंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. ऋषिकेश देशमुखांना मी ओळखत नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कधीच भेटलो नाही, असं सुनील पाटील यांनी म्हटलं आहे.
मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर १० तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. या प्रकरणात मला अडकवून हे लोक मला ठार मारतील याची मला भीती वाटतेय असं मी मलिक यांना सांगितलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं. तसेच, ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध नाही. ऋषी देशमुख यांना मी ओळखत नाही. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं. बनावट रेकॉर्डिंग दाखवली. त्याचाही तपास झाला पाहिजे. वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, असं ते म्हणाले.
कंबोज यांनी त्यांच्यावर बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यालाही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. मी जर बदल्यांचं रॅकेट चालवतोय तर माझ्याकडे किमान १०० कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास करा आणि नंतर रॅकेटची वार्ता करा, असं आव्हानच त्यांनी कंबोज यांना दिलं.
सध्या मी अहमदाबादमध्ये नोवाटल, हिल्टॉन हॉटेलमध्ये होतो. पाच सहा दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशालीने मला दिल्लीला बोलावलं होतं. मी भाड्याची कार घेऊन दिल्लीला गेलो होतो. दिल्लीत गेल्यावर पहिल्या दिवशी मला धमकी दिली. मारहाण केली. इथून गेला तर मारून टाकू, आम्ही मोठ्या नेत्यांना भेटणार आहोत. तू यांना एक्सपोज कर, असं मला धमकावलं. त्यावर, काय एक्सपोज करू? जे सत्य आहे ते सांगा ना. मी कशाला कुणाला एक्सपोज करू, असं मी त्यांना सांगितलं, असं ते म्हणाले.