एरंडोल (प्रतिनिधी) राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच संघटना यामध्ये सहभागी झाल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एरंडोलच्या माध्यमातून पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी आज बंद आहे. मागील काही वर्षापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्य सरकार कर्मचारी म्हणून सामावून घेण्याचा व अशा विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत, या संदर्भात अनेक वेळी राज्यात आंदोलने देखील झाली आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्य शासनाकडून दिले गेले, परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आंदोलन झालेली आहेत. या आंदोलनादरम्यान ३७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल देखील उचलले आहेत. कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेला कामबंद आंदोलन प्रसंगी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. परंतु योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे आता पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीसंदर्भात गैरसोय होत आहे. ११ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करतात, अनेक वाडी-वस्ती व गावात प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे, योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे मागणी पत्रक अभाविपने राज्यपाल, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिले.
यावेळी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देत योग्य तो तोडगा काढावा. अभाविप महाराष्ट्र प्रदेश व जळगाव जिल्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या मागण्यांत सोबत आहे आणि वेळ पडल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आंदोलन देखील करतील.
यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, शहरमंत्री रितेश ठाकरे, आनंद महाजन, भावेश जगताप, प्रथमेश कासार, नितेश चौधरी, चेतन पाटील, वरद विसमुते, निरज पाटील, योगेश चौधरी, यश जगताप, ईश्वर भोई, महेश पाटील, भुषण पाटील, भावेश लोहार, कल्पेश वानखेडे व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.