मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटिशीविरोधात बंडखोरांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे सुनावणीवर विद्यमान शिंदे गट-भाजप युती सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार की राहणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. या 16 बंडखोरांच्या आमदारकीवर गदा आली तरी शिंदे-फडणवीस सरकारला मात्र तितकासा धोका नसल्याचं चित्र आहे. दरम्यान आज महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याचं बोललं जात आहे. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या या सत्तांतरानंतरही मूळ प्रश्न बाकीच राहतो, तो म्हणजे या राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाचे काय करायचे? आज न्यायालयात जे काही होणार आहे ते त्यामुळेच महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे असेल.
सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत आपलाच विजय होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ‘माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. सुनावणीचा जो काही निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण देशात लोकशाहीचे भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे, डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार कारभार होणार आहे का, हे सर्व या निकालामधून स्पष्ट होईल’, असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. तर, ‘न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचे केले नाही. आम्हीच शिवसेना आहोत, हे लवकरच सिद्ध होईल’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला नरहरी झिरवाळ यांचं उत्तर
सर्वोच्च न्यायालयाने त्यावर राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली होती. तसेच त्यांना पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर कायद्याप्रमाणे आपण योग्य असून शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तर देण्यासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे नियमबाह्य वर्तन नसल्याचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. तसंच माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते सुप्रीम कोर्टात पोहोचले याचं आश्चर्य वाटलं असंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांनी ही भूमिका मांडली आहे.
अपात्रतेची टांगती तलवार असलेले हे 16 आमदार कोण?
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे.