बीड (वृत्तसंस्था) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंच्या कानशिलात लगावल्याचा दावा केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. तर सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळला असून ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या गोष्टीची गंभीर दखल घेत जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीचे आदेश मातोश्रीवरून निघाल्याची माहिती समोर येत आहे.
बीड शहरात 20 मे रोजी होणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा होणार आहे. त्यापूर्वीच ठाकरे गटाच्या शिवसेनेत पक्षअंतर्गत वाद उफाळून आला आहे. सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेतात. आपल्या कार्यालयात एसी, सोफा आणि फर्निचर करण्यासाठी देखील पदाधिकाऱ्यांकडून सुषमा अंधारे पैसे घेत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केले होते. एवढेच नव्हे तर त्यामुळे आपण अंधारे यांना दोन चापटा कानशिलात लगावल्या असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. या सगळ्यानंतर एका रात्रीत मातोश्रीवरुन आप्पासाहेब जाधव यांच्या हकालपट्टीचा आदेश निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बीडच्या संपर्कप्रमुखांवरही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण काही झाली असती तर ते जिवंत परत गेले असते का ?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे, अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचं काहीतरी टोकाचं भांडण झालं. त्या भांडणात मला मारहाण झाली वैगेरे ही माहिती चुकीची आहे. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे, असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिले आहे.