सातारा (वृत्तसंस्था) राज्यात औरंगाबाद शहराचा नामांतराचा वाद शिगेला असताना साताऱ्यात संतप्त घटना घडली आहे. सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (दि ९ जानेवारी) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
सातारा शहरात ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. गेल्या ३ वर्षांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते. ६६ कोटी रुपये खर्चून हा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सातारा शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी मदत मिळणार आहे. ‘एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल तर प्रत्येकाने आपली सविस्तर भूमिका मांडली पाहिजे. पण नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे पूर्वज आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा इतिहास वाचावा. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून बघितलं नाही तर त्याच्या कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ओळखत होते’ असं उदयनराजे म्हणाले.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (९ जानेवारी) सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला नाम फलक अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले.
‘अनेक ठिकाणी आपण पाहतो की जुन्या शहरांची नाव बदलण्यात आली आहे. ज्याप्रमाणे बाँबे शहराचे मुंबई झालं त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेले औरंगाबाद शहराचे नाव बदलायचे असेल तर लोकशाही नुसार लोक निर्णय घेतील’, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.