मुंबई (वृत्तसंस्था) विकास होत राहील पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोना संसर्गाने आपल्याला धडा दिला आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे ठाकरे म्हणाले की, विकास होत राहील पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोना संसर्गाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरू केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरू झाल्यानंतरही आरोग्य सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविड संसर्गाची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहेत. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. बेड्सची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत.’
पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील, असे कौतुकोद्गारही काढले. पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत आणि स्वयंपूर्णतेसाठी ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ राबविण्यासाठी म्हणून विविध प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनीही सहभाग घेतला.