मुंबई (वृत्तसंस्था) देहूमधील आजच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण न करु दिल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मात्र वेगळाच संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
‘छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून, कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही.’ ‘वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!’ असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.