जळगाव (प्रतिनिधी) किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाईन ही दारू आहे. त्यामुळे गावापर्यंत दारू जात आहे. अशा स्वरुपाची भूमिका अण्णा हजारेंची आहे. म्हणून त्यांनी वाईनला विरोध केला आहे, असं खडसे म्हणाले.
किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन, राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अण्णा हजारेंची भूमिका नेहमीच भाजपला समर्थनाची असते, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. तर, महाविकास आघाडीचे नेतेही अण्णांच्या भूमिकेवर बोलत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. किराणा दुकानातील वाईन विक्रीमुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.
राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार आहे, असं पत्रकात म्हटले आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी अण्णांच्या विरोधावर भाष्य केलंय. द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा आणि वेदना सांगितल्या. मार्केटमध्ये, द्राक्षांना भाव पाहिजे असेल तर उपउत्पादनांवर भर दिला पाहिजे. त्यामध्ये, वाईन हा प्रकार अगदी अलीकडच्या कालखंडांत सर्वत्र विकलाच जात आहे, अशी त्यांची भूमिका आहे. याउलट वाईन ही दारू आहे. त्यामुळे गावापर्यंत दारू जात आहे. अशा स्वरुपाची भूमिका अण्णा हजारेंची आहे. म्हणून त्यांनी वाईनला विरोध केला आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले.
मध्यप्रदेशात मॉलमध्ये बिअर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर दारुही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य तेथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.