चंदीगड (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करीत असून गरीब व दलितांकडे कानाडोळा करून काही मूठभर अब्जाधिशांसाठी काम करीत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ‘अग्निवीर’ योजना ही सैनिकांची पेन्शन, कँटिन सुविधा व त्यांना मिळणारा शहीद दर्जा काढून घेण्याचा मार्ग असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.
हरयाणातील सोनिपत जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काही मोठ्या उद्योगपतींचे हित जोपासत आहे. पण, देशातील गरीब, शेतकरी आणि युवकांचे कल्याण करण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. हरयाणातील एक छोटा व्यापारी मला भेटला व मोदी व हरयाणा सरकारने आपला व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचे त्याने सांगितले. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे आपले नुकसान झाल्याचे व्यापारी म्हणाला. मोदी सरकार अदानी व अंबानी यांची मदत करीत असल्याची कबुली त्या व्यापाऱ्याने दिली, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला. केंद्र सरकारने सार्वजनिक कंपन्या, शासकीय कारखान्यांचे खासगीकरण केले. शस्त्र बनवण्याचे कंत्राट अदानी व अंबानींच्या कंपनीला दिले. मोदी केवळ अदानी यांना संरक्षण कंत्राट देत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. गुजरातमधील मुद्रा बंदर सध्या अदानी यांच्या नियंत्रणात आहे.
या ठिकाणी हजारो किलो अमली पदार्थ (हेरॉईन) आढळले पण, या प्रकरणी किती जणांना तुरुंगात पाठवले? असा सवाल राहुल यांनी केला. हरयाणातील युवकांना रोजगार दिला जात नाही. त्यामुळे शेकडो युवकांना विदेशात जावे लागत आहे. प्रसंगी ते अवैध पद्धत अवलंब करीत आहेत. देशातील गरीब, दलित, शेतकरी व मागासवर्गीयांकडे संविधानामुळेच अधिकार आले. पण, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील संस्थांमध्ये याच दलित-आदिवासींना जागा देत नाही. संविधान नष्ट करण्याचा भाजपचा इरादा आहे. पण, आम्ही त्याचे रक्षण करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ अब्जाधिशांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकरी, विद्यार्थी, माता-भगिनींचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा टोला त्यांनी लगावला.