नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतावर तिसऱ्या कोरोना लाटेचं संकट घोंघावत आहे. देशात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ओमायक्रॉन बाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १७ हजार १०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत देशात १ लाख १७ हजार १०० नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. भारतात मागील २४ तासांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून ३ लाख ७१ हजार ६३ झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. केवळ या तीन राज्यांमध्ये ६० टक्के नवे कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या ४ लाख ८३ हजार १७८ वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल ३० हजार ८३६ लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत ४ कोटी ४३ लाख ७१ हजार ८४५ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाचे तीन कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ रुग्ण आढळले आहेत.
देशावर ओमायक्रॉनचं वाढत संकट
देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार गेली आहे. भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचे ३००७ रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढताना दिसत आहे. आता देशात या व्हेरियंटनं दुसरा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बोलांगीरमध्ये ५५ वर्षांच्या एका महिलेचा ओमायक्रॉनमुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका ७३ वर्षांच्या वृद्धाचा ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही व्यक्तींनी बाधित होण्यापूर्वी विदेशवारी केलेली नव्हती.