अहमदनगर (वृत्तसंस्था) शेतात हार्वेस्टरने ऊस तोडणी चालू असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने अंगावर चाक जाऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. बाळासाहेब अंबादास जगताप वय (वय ५०), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
तामसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब अंबादास जगताप यांच्या शेतात भाऊबिजेच्या दिवशी हार्वेस्टर मशिनने ऊस तोडणी सुरू होती. शेतात पडलेले उसाचे टिपरे ते गोळा करीत होते. उसाचे तुकडे गोळा करून ट्रॉलीमध्ये टाकत असताना अचानक हार्वेस्टरने रिव्हर्स घेतला. त्यामध्ये आवाज आणि मशिनच्या उंचीमुळे हार्वेस्टर चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे उसाच्या खोडामध्ये गुंतून शेतकरी चाकाखाली आले. त्यांच्या छातीवरून चाक गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.
बाजूला उभ्या असलेल्या कामगारांच्या लक्षात ही घटना आली. तातडीने धावपळ करून गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ, बहीण, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुळा कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब जगताप यांचे ते बंधू, उद्योजक देवीदास जगताप यांचे चुलते होत.
















