चंद्रपूर (वृत्तसंस्था) लग्नांची वरात निघण्यापूर्वी नातेवाईकांवर नववधूची अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ नियतीने आणली. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले. वैशाली महादेव गेडाम (वय २४, रा. विसापूर ता. बल्लारपूर) असे दुर्दैवी भावी नववधूचे नाव आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील वैशाली गेडाम व जय टेकाम याचे लग्न जुळले होते. हे दोघेही काही वर्षांपूर्वी एकाच दुकानात कामाला होते. एकत्र काम करीत असताना दोघांची मने जुळली. त्यांचा साखरपुडा देखील पती काही वर्ष एकाच दुकानात कामाला होते. दोघांनाही एकमेकांचा स्वभाव आवडला. अशातच उभयतांना एकमेकांचा सहवास लाभला. भावी आयुष्यांची स्वप्ने रंगवत असताना तिला आजाराने घेरले. आजार तिच्या भावी आयुष्यात काळ म्हणून आला. सोमवारी तिचा विवाह नियोजित होता. तर रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. परंतु, लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच तिला काळाने हिरावले. ही मनसुन्न करणारी घटना रविवार २८ एप्रिल रोजी विसापुरात झाला होता.
२९ एप्रिल रोजी म्हणेज एका दिवसावर विवाह होता. रविवारी घरी हळदीचा कार्यक्रम होणार होता. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. आठ दिवसांपूर्वी तिला आजाराने अस्वस्थ वाटू लागले. वैशालीला उपचारार्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. तिला कावीळसदृश्य आजार झाल्याची माहिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात चार दिवस उपचार करून देखील तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. परिणामी रुग्णालय प्रशासनाने तिला पुढील उपचारांसाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तेथेही डॉक्टरांनी तिच्यावर चार दिवस उपचार केले. मात्र डाक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
२७ एप्रिल रोजी वैशालीने उपचाराला दाद न देता तिची प्राणज्योत मालवली. वैशालीच्या अकाली मृत्यूने समाजमन हळहळले. तिच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने हिरावले. तिच्या लग्नाची वरात काढण्यापूर्वीच अंत्ययात्रा निघाल्याने नातेवाईक व आप्तेष्टानी एकच हंबरडा फोडला. रविवारी विसापूर येथील शम्शानभूमीवर अत्यंत शोकाकुल वातावरणात वैशालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.