मुंबई (वृत्तसंस्था) “ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे. पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केली जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे”.
देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलेलं असून संसदेत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये वादळी चर्चा सुरु आहे. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बुधवारपासून चर्चा सुरु करण्यात आलेली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करत आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्रावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते देशासाठी योग्य नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचं सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. राउत पुढे म्हणाले, ‘संसदेतील आमचे सहकारी संजय सिंह यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. राजदीप सरदेसाई नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. सिंघु बॉर्डरवर रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि लेखकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो.’‘देशातील कायद्यातून IPC च्या सर्व कलमा संपवल्यात,असे वाटत आहे. आत फक्त देशद्रोहाची कलम लावली जाते. आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा आदर करतो आणि पुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे, पण बहुमत अहंकाराने नाही, तर सर्वसम्मतीने चालते.’
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवणारा आणि प्रक्षोभक भाषण करणारा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण अद्याप फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखांचं रोख बक्षिस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी ५०,००० रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.
दीप सिद्धू पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली आहे. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार काउन्सिलचा सदस्यही राहिला आहे. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. महत्त्वाचं म्हणजे भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं.
















