जळगाव (प्रतिनिधी) ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे. या निलंबनावर आमदार महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी महाविकास आघाडी सरकार ढिम्म बसून आहे. त्यांना ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
भाजपच्या आमदारांनी नव्हे तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी असभ्य वर्तन केल्याचे सर्वांनी पाहिले असून याचे सीसीटिव्ही फुटेज सरकारने तपासण्याची गरज आहे. मात्र, आपल्या आमदारांवर कारवाई करायचे सोडून भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याचे काम या सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. याचाच अर्थ या सरकारला ओबीसींच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. तसेच भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकार बदनाम झाले असून सभागृहात आपली कोंडी होऊ नये म्हणून भाजपचे १२ आमदार निलंबित करून विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी करण्याचे कारस्थान रचल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.
या अधिवेशनात मराठा व ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी, कोविड मुळे विस्कळीत झालेली विकासकामे आदींसह अनेक मुद्यांचा समावेश होता. तथापि, सरकारला यावर चर्चा होऊ द्यायची नव्हती. कारण गेल्या काही महिन्यांमधील सरकारचे प्रताप यातून समोर आले असते. यात वाझे प्रकरण, दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक आदींसह इतर नेत्यांच्या भ्रष्टाचारातील वेगवेगळे कंगोरे अजून जगासमोर आले असते. यामुळे आमदारांना निलंबीत करण्याचा कट रचल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.