जळगाव (प्रतिनिधी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपलं अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्यातील राजकारण्यांच्या कान टोचले आहेत. राज्यापालांच्या अभिभाषणानंतर राजकारण करता आलं असतं. त्यांना अभिभाषण पूर्ण करुन द्यायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. मात्र, अजूनही याचा सखोलपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले असून केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा राज्य सरकारला दिला असता तर तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी जी कसरत करावी लागली ती करावी लागली नसती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने अहवाल स्वीकारला नसल्याने हा ओबीसींवर अन्याय असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी असल्याचा आरोप करत थेट भाजपवर खडसेंनी निशाणा साधला आहे.