हिंगोली (वृत्तसंस्था) वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा (जि. हिंगोली) सज्जाचे तलाठी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकुने भोसकून त्याचा निघृण खून केल्याची घटना बुधवारी (दि.२८) भरदुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. फेरफार प्रलंबित राहिल्याच्या कारणावरून सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून यात तलाठी संतोष पवार यांचा मृत्यू झाला आहे.
वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून आडगाव रंजेबुवा येथे कार्यरत होते. मागील तीन वर्षापासून त्यांना आडगाव रंजेबुवा व बोरी सावंत हे दोन तलाठी सज्जे देण्यात आले होते. बुधवारी (दि.२८) सकाळी तलाठी पवार हे नेहमी प्रमाणे आडगाव रंजेबुवा तलाठी सज्जा कार्यालयात येऊन कामकाज करीत बसले होते. दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवर कार्यालयात आला. यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफार प्रलंबित असल्याच्या कारणावरून वाद घातला. दोघांत वाद टोकाला गेला. यात आरोपीने संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्यावर चाकुने हल्ला केला. यावेळी पोटात चाकूचे वार झाल्याने तलाठी पवार घाबरले. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. परिसरातील नागरिकांनी पवार यांना उपचारासाठी रूग्णालयात नेले परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
















