नागपूर (वृत्तसंस्था) स्वागत समारंभ आटोपल्यानंतर मावशी घरी जाण्यासाठी निघाली. तिला मंडपाबाहेर सोडण्यासाठी म्हणून पवार दाम्पत्य लग्नमंडपातून बाहेर आले. त्यांच्यासोबत त्यांचा पाच वर्षाचा मुलगाही होता. घरी जात असलेल्या मावशीला पाहून तो मावशीप्रेम आवरू शकला नाही आणि रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या मावशीकडे जाण्यासाठी धावत सुटला. त्याचदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव कारखाली तो आला आणि चिरडल्या गेल्याने जागीच मरण पावला. ही घटना रविवार, २८ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता वेळाहरी- बेसा रोडवर घडली. चिरायू अनोद पवार (रा. राजीवनगर, वडधामना), असे अपघातात मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
मावशी घरी जात असल्याचे पाहून धावत निघाला !
डोळ्यासमोर घडलेल्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेने पवार कुटुंब प्रचंड धक्क्यात आहेत. अनोद बाबूराव पवार (२९, रा. राजीवनगर, वडधामना, वाडी, नागपूर) हे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना लक्ष्य (८) आणि चिरायू (५) ही दोन मुले आहेत. शनिवार, २० एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाइकांच्या मुलाचे लग्न झाले होते. रविवारी बेळाहरी बेसा रस्त्यावरील करण लॉनमध्ये नवदाम्पत्याच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी पवार कुटुंब आले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्य आणि चिरायू हे खेळत असताना त्यांची मावशी घरी जाण्यासाठी निघाली. चिरायूचे वडील अनोद पवार त्यांना सोडण्यासाठी रस्त्यापर्यंत गेले आणि बोलत उभे होते. यादरम्यान मावशी घरी जात असल्याचे पाहून चिरायू मावशीकडे जाण्यासाठी धावत निघाला.
पोटावरून कार गेल्यामुळे गंभीर जखमी !
रस्त्याच्या मधोमध पोहोचत नाही तोच रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या एम.एच. ४९/ बी. आर. ४९१२ या क्रमांकाच्या टाटा नॅक्सॉन कारच्या समोर आला आणि चिरडल्या गेला. कारचालकाने ब्रेक दाबले, मात्र चिरायूच्या पोटावरून कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते यांनी कारचालका विरोधात गुन्हा दाखल केला आणि कारचालक योगेश दामोदर मोहाडीकर (४२, रा. शिव लाइट टाउनशिप, शंकरनगर) याला अटक केली.
काळीज चिरणारा आक्रोश !
पवार दाम्पत्याच्या पाच वर्षाच्या चिमुकल्या चिरायूला कारने चिरडल्याची बातमी कार्यक्रमस्थळी पोहोचताच नातेवाइकांनी कार्यक्रम सोडून रस्त्यावर धाव घेतली. कारचालकाशी वाद घालून कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात नागरिकही गोळा झाले. इकडे उपचारादरम्यान चिरायूचा मृत्यू झाल्याचे कळताच स्वागत समारंभात शोककळा पसरली. त्यामुळे कार्यक्रमही आटोपता घेण्यात आला. हुडकेश्वर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, डोळ्यासमोर पोटाचा गोळा गेल्याने आई-वडिलांसह मावशीने काळीज चिरणारा आक्रोश केला होता.