नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. देशात ९१ दिवसांनी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४२ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार १६७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात एकूण ९१ दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या कमी होऊन ५०,००० च्या खाली आली आहे. गेल्या २४ तासात देशात ४२,६४० कोरोना रुग्ण आढळले. या कालावधीत एकूण १,१६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पॉझिटीव्ह दर ५ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. तसेच गेल्या २४ तासात ८१,८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आतार्यंत देशात २,९९,७७,८६१ कोरोना रुग्ण आढळले. तर २,८९,२६,०३८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच ३,८९,३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६,६२,५२१ बाधित रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
लसीकरणाचा विक्रम
कोरोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे.
राज्यातली स्थिती
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. काल ६,२७० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल १३,७५८ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,३३,२१५ इतकी झालीय. काल ९४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.