नाशिक (वृत्तसंस्था) लग्नानंतर काही वर्षांनी संपर्कात आलेल्या विवाहित प्रियकराला कुटूंबियासह आपल्या घरी मुक्कामी बोलविणे दोघांच्या सुखी संसारात विष कालविण्यात कारणीभूत ठरला आहे. लग्नाआधीच्या प्रियकराला घरी बोलावलेल्या महिलेच्या पतीने प्रियकरासह त्याच्या कुटुंबियांना डांबून ठेवत मारहाण केली. मंगळवारी (दि. २५) रात्री हा प्रकार घडल्यानंतर हा प्रकार पोलिसात पोहचला. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एका विवाहितेचे लग्नापूर्वी ठाणे जिल्ह्यातील एका डॉक्टरबरोबर प्रेमसंबंध होते. अनेक वर्ष एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडालेलं प्रेमीयुगलाने काही वर्षांपूर्वी आपापला वेगवेगळा संसार थाटला. त्यामुळे दोघांचाही संपर्क तुटला होता. कालांतराने दोघांनाही मुले बाळ झालीत. दोघेही आपापल्या संसारात रमले. मंगळवारी डॉक्टरचे कामानिमित्त नाशकात तर महिलेचे माहेरी येणे जाणे असल्याने दोघं जण पुन्हा एकमेकाच्या मोबाइलमुळे संपर्कात आले. दोघांमध्ये आता पुन्हा तासनतास गप्पा गोष्टी रंगू लागल्या. दोघं जण जुन्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमू लागले.
एकेदिवशी महिलेने मुलाबाळांची चौकशी करीत सहकुटूंब आपल्या घरी येण्याची पूर्वाश्रमीच्या प्रियकराला गळ घातली. एकेकाळच्या प्रेयसीला दिलेला शब्द पाळण्यासाठी पशु वैद्यकीय डॉक्टर असलेल्या प्रियकरानेही मंगळवारी आपल्या पत्नीसह मुलांना घेवून नाशिक गाठले. प्रियकराचे कुटुंबिय आपल्या घरी येणार असल्याने खुश असलेल्या महिलेने चांगला पाहुणचार केला.
सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या पतीनेही पत्नीच्या इच्छेखातर पाहुण्यांचे आदरतिथ्य केले. रात्री गप्पा मारत दोन्ही कुटूंबिय जेवणासाठी बसले. यावेळी गप्पा मारत असतांना पतीच्या डोक्यात संशयाचे भूत घुसले. यावेळी त्याने पाहूण्यांशी वाद घातला. यानंतर दोन्ही कुटूंबियातील हा वाद हातघाईवर गेला. संतप्त नवऱ्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने डॉक्टर कुटूंबियास शिवीगाळ व दमदाटी करीत घरात डांबून ठेवत थेट पोलिसांना घरी बोलावले.
यानंतर घरी आलेल्या डॉक्टर प्रियकरानेही मग आपल्याला डांबून ठेवल्याची फिर्याद दिली. त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी मग पतीच्या इच्छेखातर पूर्वप्रेयसीनेही मुंबईनाका पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रियकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या साऱ्या प्रकाराचा तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक साजीद मन्सुरी आणि उपनिरीक्षक शेळके करीत आहेत. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.