नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायद्याविरोधात आंदोलनावरून शेतकरी आणि विरोधकांनी आधीच मोदी सरकारला घेरलेले असताना एनडीएच्या मित्रपक्षांमध्येही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपा शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही पक्षाने एनडीए सोडत असल्याची घोषणा केली आहे.
भाजपप्रणित एनडीए आणि पर्यायाने केंद्रातील मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच आहेत. कारण कृषी कायद्यावरुन आणखी एका मित्रपक्षाने एनडीए तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानातील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने (RLP) भाजपची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, हा निर्णय जाहीर केला. बेनीवाल म्हणाले, “शिवसेना आणि अकाली दलाने आधीच भाजपची साथ सोडली आहे, आता RLP ही भाजपपासून वेगळं होत आहे” तर, कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या अगोदर अकाली दलने देखील भाजपाची साथ सोडलेली आहे.
“भारत सरकरारद्वरे आणल्या गेलेल्या कृषी विरोधी कायद्यांमुळे आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी) एनडीए आघाडीतून वेगळं होत असल्याची घोषणा करत आहे.” असं राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी जाहीर केले. या अगोदर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला होता. तसेच, या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हनुमान बेनीवाल हे आता जयपूर, जोधपूर, कोटपुतली, अलवर, नागौर, जैसलमेरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन हरियाणा बॉर्डरच्या शाहजहांपूरकडे निघाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित केले. यावेळी त्यांनी सात राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी कायद्यांचे समर्थन केले. पंतप्रधानांच्या या भूमिकेला शेतकरी संघटनांनी उत्तर दिले असून “केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे.