अमरावती (वृत्तसंस्था) माहेरी गेलेली पत्नी नांदण्यासाठी परत येत नसल्याने संतप्त झालेल्या जावयाने झोपेत असलेल्या सासू आणि मेहुण्याच्या अंगावर पेट्रोल टाकून दोघांना जाळून ठार केले. यानंतर स्वतःही पेटवून घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वरूड तालुक्यातील वंडली येथे रविवारी (२४ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर उघडकीस आली. लता सुरेश भोंडे (४७) व प्रणय सुरेश भोंडे (२२, रा. वंडली) अशी मृतांची नावे आहेत. तर आशिष पुरुषोत्तम ठाकरे (२५, रा. वरूड) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे.
घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या आले निदर्शनास !
रविवारी मध्यरात्रीनंतर १.१५ वाजताच्या सुमारास वंडली येथील रहिवासी लता भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. थोड्याच वेळात पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझविल्यानंतर घराची पाहणी केली असता तेथे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आले. या मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला होता. घराला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पथक पोहचण्याआधीच भिंत तोडून मागच्या खोलीत झोपलेल्या लता भोंडे यांच्या सासू चंद्रकला (९०) यांना सुखरूप बाहेर काढले.
मुलीचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह !
लता भोंडे या सासू चंद्रकला व मुलगा प्रणय यांच्यासोबत राहत होत्या. त्यांच्या मुलीचा सहा महिन्यांपूर्वी आशिष ठाकरे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. आशिष हा दारू पिऊन त्याच्या पत्नीला सतत मारहाण करीत होता. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी ती माहेरी परत आली. परंतु, तरीही आशिष हा वंडली येथे जाऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे लता यांनी मुलीला तिच्या मावशीकडे राजुरा बाजार येथे पाठवून दिले होते.
नेमकं काय घडलं !
पत्नी घरी नांदण्यासाठी येत नसल्याने संतापलेला आशिष हा रविवारी रात्री दारू पिऊन सासू लता भोंडे यांच्या घरी गेला. तत्पूर्वी त्याने वाटेत गाडीत पेट्रोल भरताना काचेच्या बाटलीत शंभर रुपयांचे अधिकचे घेतले होते. घरी येताच आशिषने सोबत आणलेल्या पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वतःसुद्धा पेटवून घेत आत्महत्या केली, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.
मावस सासऱ्यांना केला कॉल !
आशिषने वरूड येथील एका मित्राची दुचाकी घेऊन त्यात पेट्रोल भरले. त्याचवेळी त्याने एका प्लास्टिक बाटलीमध्ये वेगळे पेट्रोलसुद्धा घेतले. त्यानंतर त्याने रात्री मित्राला वंडली येथे सोडून मागितले. आत्महत्या करण्यापूर्वी आशिषने त्याचे मावस सासरे दिनेश निकम यांना मोबाइलवर कॉल केला. सासू आणि साळ्याची हत्या केली असून, स्वतः ही आत्महत्या करीत असल्याचे त्याने त्यांना सांगितले, असे तपासात समोर आले.
अशी पटली आशिषच्या मृतदेहाची ओळख !
घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान दोन मृतदेह हे लता व त्यांचा मुलगा प्रणय यांचा असल्याचे समोर आले होते. परंतु, तिसरा मृतदेह कुणाचा? असा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, घटनास्थळावर आढळून आलेल्या बॅग, जॅकेट, पॅनकार्डवरून तिसरा मृतदेह हा आशिषचा असल्याचे समोर आले.
भजनाचा कार्यक्रमामुळे आरडाओरड ऐकू आली नाही !
रविवारी रात्री वंडली येथील एका गणेश मंडळात भजनाचा कार्यक्रम सुरु होता. सासूला व मेहुणा प्रणव झोपेतच असतानाच त्याने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली. यावेलो दोघांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. मात्र, भजनाच्या आवाजात ती ओरड कुणाच्या कानी पडली नाही. दोघेही जळून खाक झाल्याचे बघताच त्याने स्वतः लाही संपविले.