मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचत आहेत, त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले इतिहास लेखन हे दंगलीचे स्त्रोत पसरवणारे लिखाण आहे. त्या माध्यमातूनच महाराष्ट्रात दंगली झाल्या होत्या. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे.
दरम्यान संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असे म्हणत आखरे यांनी राज यांना चर्चेचं निमंत्रण दिलं असून आम्ही खरा इतिहास समोर आणून दाखवू असे म्हटले आहे.
“राज ठाकरेंनी इतिहासासंदर्भात भाष्य केलं. काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे. सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. आपण प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारस असला तरी विचारांचे वारसदार होऊ शकला नाहीत. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात,” असं आखरे यांनी म्हटलं आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं इतिहास लेखन हे दंगलीचं स्त्रोत पसरवणारं लेखन आहे. त्या माध्यमातूनच दंगली या महाराष्ट्रात झाल्या होत्या. पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत,” असं आखरे म्हणाले आहेत.