पुणे (वृत्तसंस्था) राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकार कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते.
दिल्लीच्या वेशीवर गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन सुरु असताना भाजपाकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत आणि खासकरुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. देवेंद्र फडणवीस पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. “नरेंद्र मोदी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रानस्फर करणार आहेत. आमच्या शेतकऱ्याला मुक्ती मिळाली पाहिजे, जिथे माल विकायचा आहे तिथे विकता आला पाहिजे आणि त्यासाठी बंधन नसलं पाहिजे. शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. “जेव्हा लॉकडाउन सुरु होता तेव्हा कोकणातील शेतकऱ्यासमोर आंब्याचं काय होणार हा प्रश्न होता. पण आपण फळे नियमनमुक्त केल्याने शेतकऱ्याला मुंबईच्या सोसायट्यांमध्ये माल विकता आला. आंब्याच्या बागायतादारांनी मला साहेब जितका पैसा लॉकडाउनध्ये कमावला तितका याआधी कमावला नसल्याचं सांगितलं. कारण आम्ही सोसायट्यांमध्ये माल विकू शकलो,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
“काही लोकं तर दुटप्पी भूमिका घेतात. कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने २००६ मध्ये केला. मोदींनी देशासाठी जो कंत्राटी शेतीचा कायदा केला आहे तो २००६ सालीच राज्यात झाला आहे. २००६ ते २०२० पर्यंत १४ वर्षात कुठेही शेतकऱ्याची शेती गेली, लुबाडलं, नुकसान झालं अशी एकही घटना झाली नाही,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. “मोदींनी जो कायदा आणला आहे त्यात वाद झाला तर शेतकरी न्यायालयात जाऊ शकतो असं स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्राच्या कायद्यात कुठेही जाण्याची मुभा नाही. नव्या कायद्यात शेतकरी जाऊ शकतो पण व्यापारी कोर्टात जाऊ शकत नाही. शेतकऱ्याला संरक्षण देणारा कायदा मोदींनी तयार केला आहे,” असं ते म्हणाले.
ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवरदेखील फडणवीस यांनी जोरदार टीका केली. ‘आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला,’ अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा समाचार घेतला.