सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते सिंधुदूर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे”, अशी टीका केली आहे.
नारायण राणे आज कोकणात होते. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी या बैठकीवरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका राणेंनी केली. महाराष्ट्रातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र धगधगतोय त्याचं खापर भाजपवर फोडण्याचं कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
जिल्ह्याचा विकास फंड हा दिवसेंदिवस कमी होत आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फक्त ९ टक्के खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. सिंधुदुर्गाला तर ज्या प्रकारे वागणूक दिली जाते ती अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात वादळ आलं, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. आता कुठे निधीचं वाटप होणार आहे. जिल्हा नियोजनाची बैठक ही निव्वळ औपचारिकता आहे. जानेवारीनंतर आज बैठक होत आहे. विकासाला चालना मिळेल असं बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असं या सरकारचं धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने ४६ कोटी रुपये दिले होते. मात्र, विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून तो निधी परत मागवून घेतला, असा गंभीर आरोप राणेंनी केला.